नाशिक लाईव्ह न्यूज । ३ जून २०२५ । महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अर्थकारण समृद्ध करणाऱ्या द्राक्ष पिकासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत प्लास्टिक कव्हर प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट या नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानापासून द्राक्ष बागांचे संरक्षण व्हावे यासाठी शासनाकडून प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञानाचा लाभ देण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 4,81,344 रुपये प्रति एकर खर्चाच्या 50 टक्के अनुदान म्हणजेच 2,40,672 रुपये प्रती एकर इतके अनुदान देण्यात येणार आहे. हा प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी लागू असून, क्षेत्रमर्यादा प्रति लाभार्थी 20 गुंटे ते 1 एकरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
योजनेचा उद्देश गारपीट आणि अवकाळी पावसापासून द्राक्ष बागांचे संरक्षण करणे, उच्च दर्जाच्या व निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, फळबागांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आणि ग्रामीण भागातील युवकांना कृषि क्षेत्रात स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे असा आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये अंग्रीस्टँक फार्मर आयडी, 7/12 उतारा (द्राक्ष पिकाच्या नोंदीसह), 8-अ, आधार कार्डाची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकचा पहिला पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी), विहित नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र आणि चतुःसीमा नकाशा यांचा समावेश आहे.
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक सुभाष काटकर यांनी केले आहे. योजनेची सविस्तर माहिती कृषि विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावर तसेच नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयातून मिळवता येईल.