जळगाव लाईव्ह न्यूज । मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. 12 पैकी सहा संचालकांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांची साथ सोडत संचालक तथा आमदार सुहास कांदे यांच्या गटाला जाऊन मिळाले आहेत. यामुळे भुजबळ गटाची सत्ता संपुष्टात येऊन आ. कांदे समर्थकांची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान सभापती दीपक गोगड यांच्याविरुद्ध उपजिल्हा निबंधकांकडे मनमानी कारभाराबाबत तक्रार अर्ज देत गोगड यांचे अधिकार काढून घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, शुक्रवारी बाजार समितीची सर्वसाधारण सभा असून, त्यात गोगड यांच्याविरुद्ध आमदार कांदे गटातील संचालक अविश्वास ठराव आणण्याची दाट शक्यता आहे.
दीड वर्षापूर्वी बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक झाली होती. यात 10 जागांवर भुजबळ समर्थक, तर चार जागांवर आ. कांदे समर्थक विजयी झाले होते. दोन जागा व्यापारी गटाला मिळाल्या होत्या. हे दोन्ही व्यापारी संचालक भुजबळ गटाला जाऊन मिळाल्यामुळे त्यांचे संख्याबळ 12 झाल्याने भुजबळ समर्थकांनी बाजार समितीची सत्ता काबीज केली होती. मात्र, त्यानंतर प्रथम संचालक असलेले माजी आ. संजय पवार यांनी भुजबळ यांची साथ सोडली. त्यानंतर आणखी पाच सदस्य आमदार कांदे गटात सहभागी झाले असून, सध्या आ. कांदे समर्थकांची संख्या 10 झाली आहे. त्यात संजय पवार, किशोर लहाने, कैलास भाबड, मधुकर उगले, अशोक डगळे, दशरथ लहिरे, आप्पा कुणगर, विठ्ठल आहेर, सुभाष उगले आणि संगीता कराड आदींचा समावेश आहे. तर भुजबळ गटाकडे अवघे सहा सदस्य उरले आहेत. 18 सदस्य असलेल्या बाजार समितीत सत्ता स्थापनेसाठी 10 सदस्यांची आवश्यकता आहे. आता आ. कांदे गटाकडे 10 सदस्य असून, व्यापारी गटातील दोन सदस्यदेखील या गटाला साथ देणार असल्याचे समजते. त्यामुळे बाजार समितीतून भुजबळ समर्थकांची सत्ता संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
भुजबळांना तिसरा धक्का?
आमदार कांदे यांच्याकडून छगन भुजबळ यांना हा तिसरा मोठा धक्का मानला जात आहे. या अगोदर विधानसभा निवडणुकीत 2019 साली आमदार कांदे यांनी पंकज भुजबळ यांचा पराभव करून पहिला धक्का दिला. आता नुकत्याचा पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत समीर भुजबळ यांचा पराभव करून दुसरा तर बाजार समितीत असलेली सत्तादेखील काबीज करून कांदे यांनी भुजबळांना तिसरा धक्का देण्याची तयारी केल्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.