नाशिक लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२५ । नुकतीच बारावी परीक्षा पार पडली असून यानंतर आता विद्यार्थ्यांसह पालकांना निकालाची प्रतीक्षा आहे. मात्र यातच विरारमध्ये 12 वी कॉमर्सच्या तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
विरारमध्ये शिक्षिकेच्या घराला आग लागल्यामुळे बारावी बोर्डाच्या परिक्षेच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. या घटनेमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. उत्तरपत्रिका जळालेल्या त्या विद्यार्थ्यांचे काय होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
याबाबत असे की, विरार पश्चिमेला असलेल्या बोलिंज नानाभाट रोड इथल्या गंगुबाई अपार्टमेंटमध्ये 10 मार्च रोजी आगीची घटना घडली. शिक्षिकेने उत्तपत्रिका तपासायला घरी नेल्या होत्या. पण समोवारी अचानक घराला आग लागली. या आगीत उत्तर पत्रिकांसा पूर्ण गठ्ठाच जळून खाक झाला आहे.
या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होणार आहे. उत्तर पत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. बारावीच्या उत्तरपत्रिका शाळेतच तापसणे बंधनकारक असताना देखील शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी नेल्याच कशा असा प्रश्न विचारला जात आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिक्षिकेविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
दादा भुसे यांनी सांगितले की, ‘बारावी कॉमर्सच्या या १७५ उत्तर पत्रिका आहेत. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या होत्या. त्याचे मार्क्स शाळा/कॉलेजकडे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कुठलेही नुकसान होणार नाही. उत्तर पत्रिका घरी नेणे आणि ज्यांनी त्या घरी घेऊन जाऊ दिल्या, ज्यांच्या घरी जळाल्या त्यांच्यावर कारवाई होईल. याप्रकरणाची चौकशी होईल.’