नाशिक लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२५ । नाशिकमध्ये आज १६ एप्रिल रोजी उद्धव ठाकरे गटाचं निर्धार शिबीर पार पडत असून याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
“आज जेव्हा मला नाशिकला यायचं होतं, तेव्हा मी राऊतसाहेबांना फोन केला. संजयकाका उद्या बोलायचं काय? मला विषय काय दिलाय? ते लगेच बोलले, महाराष्ट्र चाललाय तरी कुठे? या विषयावर बोलं. प्रश्न हाच आहे की, महाराष्ट्र चाललाय तरी कुठे? या सरकारला 100 दिवस उलटून गेले आहेत” असं आदित्य ठाकरे म्हणाले. “लहानपणापासून राजकारणाची आवड होती. 7 ते 10 वर्षाचा असल्यापासून हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे, माझे वडिल उद्धव ठाकरे यांच्यासोबत गाडीत, विमानात बसून दौऱ्यावर निघून जायचो. एकदा 10 वी परीक्षेच्या चार दिवस आधी वडिलांसोबत श्रीवर्धन दौऱ्यावर गेलो होतो” अशी आठवण आदित्य ठाकरे यांनी सांगितली.
“कुठलही सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले 100 दिवस हनीमून पीरियड असतो. या काळात मुख्यमंत्री जे काही करतात, त्याचं कौतुक होतं. या महाझुठी सरकारचे पहिले 100 दिवस कसे होते? एकतरी चांगली योजना आणली का? निवडणूक आयोगाच्या आशिर्वादामुळे बसलेल्या या सरकारने शेतकऱ्यांसाठी 100 दिवसात एकतरी चांगली योजना आणली का?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.