नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, त्यावरून महायुतीतील पक्षांमध्ये अद्यापही धुसफूस सुरू आहे. मात्र असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे.
एकीकडे अजित पवार गट नेत्यावरील आरोपांमुळे अडचणीत आलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाले. यातच धनंजय मुंडे यांनी राजीमान दिला. दुसरीकडे शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे देखील अडचणींत सापडलेत.
याच दरम्यान हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे. वाशिमचे पालकमंत्री म्हणून मुश्रीफ यांची नेमणूक करण्यात आली होती, मात्र आता त्यांनी वाशिमचे पालकमंत्री पद सोडल्याची बातमी समोर आली आहे. हसन मुश्रीफ हे कोल्हापूरशी संबधित आहेत. वाशिमचे पालकमंत्रीपद मिळाल्यावर त्यांनी वक्तव्यही केल्याने चर्चेत होते. पण आता त्यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
मुश्रीफांनी का सोडलं पालकमंत्री पद ?
सहावेळा आमदार राहिलेले हसन मुश्रीफ यांच्याकडे फक्त तीन आमदार असलेल्या वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं होतं. कोल्हापूरचे आमदार आणि मंत्री असलेले मुश्रीफ यांना ज्या जिल्ह्याच पालकमंत्री पद देण्यात आलं तो वाशिम जिल्हा बराच दूरचा आहे. कोल्हापूर ते वाशिम हा प्रवास जवळपास 600 किलोमीटरचा आहे. त्यामुळे वाशिमचं पालकमंत्री पद मिळाल्यानंतर त्या ठिकाणी येण्याजाण्यासाठी मुश्रीफ यांचे प्रवासात जवळपास दोन दिवस जात होते. त्यामुळे कोल्हापूर या त्यांच्या मतदारसंघात त्यांना लक्ष देता येत नव्हतं . या कारणास्तव त्यांनी वाशिमचं पालकमंत्री पद सोडल्याची माहिती समोर येत आहे.