नाशिक लाईव्ह न्यूज । ५ मे २०२५ । विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नाशिकहून सटाण्याकडे परतत असताना कारला भीषण अपघात झाल्याची घटना कळवण फाट्याजवळ घडली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भयानक होता की, कारचा चक्काचूर झाला. मृत्यू झालेले सर्वजण देवळा येथील रहिवासी असल्याचे समजते.
प्राथमिक माहितीनुसार, हे सर्वजण नाशिक येथील एका विवाह सोहळ्यास उपस्थित राहून परतत होते. कळवण फाट्याजवळ हा अपघात घडला. कारचा वेग जास्त असल्याने आणि नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले, मात्र कारमधील सर्व प्रवाशांना वाचवणे शक्य झाले नाही.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत ३ मृतदेह ताब्यात घेतले. मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघातमधील इतर जखमींना पोलिसांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तीन जणांनी प्राण सोडले. पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.