नाशिक लाईव्ह न्यूज । खरीप हंगामात बोगस खते व बियाण्यांची विक्री होऊ नये याकरिता जिल्हा व तालुकास्तरावर प्रत्येकी एक अशी एकूण १६ भरारी पथके तयार केलेली आहेत. या पथकांमार्फत बोगस खते व बियाणे विक्रीला आळा घालण्यात येणार आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी मुबलक प्रमाणात बियाणे आणि खते शेतकऱ्यांना कशी मिळतील, यासाठी तालुकास्तरावर सूक्ष्म नियोजन केले आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक करताना कोणी आढळल्यास भरारी पथकाच्या माध्यमातून अचानक धाडी घालून वेळोवेळी तपासण्या केल्या जातील. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, सक्तीची कृषी निविष्ठाची लिंकिंग शेतकऱ्यांना केल्यास तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याची सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे. कोणत्याही खताबरोबर लिंकिंग केल्यास खालील क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे, मोहीम अधिकारी दीपक सोमवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक डॉ. जगन सूर्यवंशी, तंत्र सहायक श्याम पाटील यांनी केले आहे.
१,१०,३३१ मे. टन खतसाठा
जिल्ह्यात मुबलक प्रमाणात बियाणे आणि खते उपलब्ध होतील. गुरुवारी (दि. २२) ११०३३१ मेट्रिक टन खत व २७५९९ क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अभिमन्यू काशीद यांनी दिली. तालुकास्तरावर एक तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. कृषी अधिकारी, पंचायत समिती हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.